लातूर प्रतिनिधी : शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याची गरज आहे त्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे हटवावीत वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी सर्व उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी दिल्या. लातूर शहर महानगरपालीकेत सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी,निधीचा विनियोग योग्य होईल याची दक्षता घ्यावी. योजनांची कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसार दर्जेदार पद्धतीने करावीत.एकूण कारभार पारदर्शकआणि लोकाभिमुख राहील, हे पाहावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या. बुधवारी आ.अमित देशमुख यांनी खा. डॉ.शिवाजी काळगे यांच्यासह लातूर महानगरपालिकेत महापौर सौ.जयश्री सोनकांबळे, उपमहापौर ॲड.स्नेहल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, माजी महापौर दिपक सुळ, काँग्रेसचे गटनेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, परिवहन समिती सभापती फैसलखान कायमखानी, मनपा आयुक्त मानसी मीना,अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. शहरात सध्या राबविण्यात येत असलेल्या विकास योजना, प्रस्तावित योजना,नियमित कामकाजाबाबत आढावा घेतला.सध्या उन्हाळी सुट्ट्या आणि लग्न समारंभांचे दिवस असल्याने शहरात वाहतूक कोंडीच्या तक्रारी येत आहेत.यावर तातडीने कार्यवाही करून शहरातील वाहतुकीला शिस्त लावावी.सिग्नल आणि सीसीटीव्ही यंत्रणा अद्ययावत करावी. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रभावीपणे अतिक्रमणविरोधी मोहीम राबवावी.शैक्षणिक संस्था, मंगल कार्यालये, रुग्णालये, व्यापारी प्रतिष्ठाने तसेच रहिवासी संकुलांत पार्किंग व्यवस्था अनिवार्य करावी. शासनमान्य सल्लागाराची नियुक्ती करून भविष्यातील नियोजनकरावे. प्रदूषणाचा स्तर कमी राहील यासाठी प्रयत्न करावेत अशी सुचना त्यांनी दिली. शहरातील कचरा व्यवस्थापनात सुधारणा झाली असली तरी त्यात आणखी दुरुस्त्या करा. कचऱ्यावर प्रक्रिया करून ढीग लागणार नाहीत याची काळजी घ्यावी. या कामकाजात महिलांचा सहभाग वाढवावा, असे आ.देशमुख म्हणाले. शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य-दिव्य पुतळा उभारणीचे काम सुरू झाले आहे.या कामाचा दर्जा आणि पारदर्शकतेबाबत तक्रारी आहेत. या प्रकल्पाचे पुनरावलोकन करावे. हैदराबादच्या धरतीवर हे काम व्हावे, अशी लोकभावना असल्याने तेथे अभ्यास गट पाठवून सूचना घ्याव्यात.डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्कचा सर्वंकष विकास आराखडा तयार करून स्मारकाची उभारणी करावी असे त्यांनी सांगीतले. शहरात नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे. पिवळे किंवा दूषित पाणी वितरित होणार नाही याची काळजी घ्यावी. ठिकठिकाणी होणारी गळती थांबवावी. हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रातून बाहेर सोडण्यात येणाऱ्या अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करावा असे निर्देश मनपा प्रशासनाला दिले. शहरातील पथदिव्यांची देखभाल नियमित व्हावी.घर तिथे पथदिवा अशी योजना तयार करून विस्तार करावा. मंजूर सोलर प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून वीज वापराच्या बाबतीत महापालिका स्वयंपूर्ण करावी. नागरिकांना बांधकाम परवाना मिळण्यात होणारी दिरंगाई टाळावी. नागरिकांना मनस्ताप होणार नाही याची काळजी घ्यावी आणि दिलेल्या परवान्याप्रमाणेच बांधकामे होतील याची दक्षता घ्यावी. शहरातील प्रलंबित कबाले वाटपाचा आढावा घेऊन, नियमानुसार असलेले कबाले वाटप ताबडतोब करावेत, यासाठी शासनाच्या नवीन धोरणाचा आधार घ्यावा असे यावेळी सांगीतले. लातूर शहरात मागच्या काळात उभारण्यात आलेल्या युनिपोल संदर्भात कायदेशीर प्रक्रिया तपासून घ्यावी, हे युनिपोल नियमानुसार नसतील तर ते काढून टाकावेत. आगामी काळात जाहिरात फलक परवानगी देताना नियमाचे उल्लंघन होणार नाही, शहराचे सौंदर्य बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी असे आमदार देशमुख यांनी सांगीतले. नागरिकांना जन्म मृत्यू प्रमाणपत्र वेळेत मिळण्यासाठी कामकाजात सुधारणा करावी. फेरीवाला धोरणाची तातडीने अंमलबजावणी करावी, गंजगोलाई तसेच शहरातील इतर ऐतिहासिक सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी असे सांगीतले.एकूणच प्रशासकीय कामकाज पारदर्शक, सुलभ आणि गतिमान होण्यासाठी एआय व इतर अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा, यासह अनेक महत्त्वाच्या सूचना याप्रसंगी केल्या असून अधिकारी, कर्मचारी यांचेही म्हणणे ऐकून घेऊन, त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येइल व आवश्यक त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपूरावा करण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. या प्रसंगी नगरसेवक फारुक शेख, विकास कांबळे, युनुस मोमीन, इसरार सगरे, डॉ. बालाजी सांळुके, अतिश चिकटे, मुक्तार शेख, अमोल लांडगे,सचिन गायकवाड यांच्यासह मनपाचे विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.









